भारताच्या राजकारणात अभिनेत्याची कमी नाही. सुरुवातीला चित्रपटांमध्ये काम करून नंतर अनेक जण नेते झाले. त्यात राज बब्बर, शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी, जया बच्चन ते आपले मराठी नट अमोल कोल्हे देखील शिरूर लोकसभा मतदार संघातून खासदार झाले. चित्रपट आणि मालिकेत काम करून राजकारण करता येत हे खूप जणांनी ओळखलं होत. त्यामुळे अगोदर चित्रपटांमध्ये काम करायचं आणि नंतर राजकारणात नशीब आजमावायचं असाच त्यांचा प्लॅन असे. १९८० -९० च्या दशकामध्ये तर फक्त रामायण किंवा महाभारत मालिकेत काम केलं कि तुम्ही खासदार झालातच म्हणून समजा असाच एक फॉर्मुला झाला होता. त्यांचं रामायणातील अभिनेत्यांची ही कहाणी !
अरुण त्रिवेदी (रामायण मालिकेतले रावण) लोकसभा निवडणूक जिंकले.
रामायणातील रावण कोणाला तरी आवडत असेल का ? तर शक्यच नाही पण अरुण त्रिवेदी यांनी त्यांच्या अभिनयाने ते अरुण त्रिवेदी आहेत कि रावण यातला फरकच प्रेक्षकांना समजू दिला नाही. रावणाची भूमिका करणाऱ्या अरुण त्रिवेदी यांनी लोकांच्या मनात त्यांचे एक स्थान निर्माण केले होते. अरुण त्रिवेदी रावण म्हणूनच देशभर प्रसिद्ध झाले होते. याचा त्यांना राजकारणात गेल्यावर फायदा देखील झाला. रामायण मालिकेची शूटिंग संपल्यावर अरुण त्रिवेदी यांनी स्वतःला राजकारणात आजमावले. १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत ते भाजप कडून सबारकथा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले.
दीपिका चिकलिया (रामायण मालिकेतल्या सीता) पण खासदार झाल्या.
रामायणातील सीता आपण सगळ्यांनी पडद्यावर बघितली आहे. दीपिका चिकलिया यांनी सीतेच्या भूमिकेला एकदम न्याय दिला आहे. पण रामायणात सीतेची भूमिका केलेल्या दीपिका चिकलिया राजकारणात येतील याचा अंदाज त्यावेळी कोणालाही आला नव्हता. रामायण मालिकेतील काम संपल्यावर दीपिका यांनी भाजपच्या तिकिटावर १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशातल्या बरोडा मतदार संघातून निवडणूक लढवली. दीपिका चकलीया मोठ्या मतांनी निवडून आल्या.
दारा सिंग (रामायण मालिकेतले हनुमान ) राज्यसभेवर खासदार झाले
रामायण मालिकेतले रावण आणि सीता दोघे राजकारणात खासदार झाले होते. तेंव्हा मालिकेतले हनुमान मागे राहतील ते हनुमान कसले. मालिकेत हनुमानाची भूमिका साकारणाऱ्या दारा सिंग यांनी देखील राजकारणाचा मार्ग धरला. जाट महासंघाच्या माध्यमातून दारा सिंग यांनी राजकारणाला सुरुवात केली. नंतर दारा सिंग यांना राष्ट्रपतींनी राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्त केले. रावण, सीता आणि हनुमान तिघेही संसदेचे सदस्य झाले होते.
नितीश भारद्वाज (महाभारत मालिकेतले श्रीकृष्ण) देखील लोकसभेचे खासदार झाले
रामायण मालिकेतले अभिनेते धडाधड संसदेत जात असताना महाभारत मालिकेत काम करणारे अभिनेते मागे कसे राहतील. महाभारत मालिकेत श्रीकृष्णची भूमिका साकारणाऱ्या नितीश भारद्वाज यांनी देखील राजकारणाचा मार्ग धरला. १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत नितीश भारद्वाज यांनी झारखंडमधील जमशेदपूर मतदार संघातून भाजपकडून निवडणूक लढवली आणि जिंकले देखील. मालिकेतले कृष्ण देखील देशाच्या संसदेत पोहचले आहेत म्हणून त्यावेळी देशभर त्यांची चर्चा झाली होती.
रामायण आणि महाभारत ह्या दोन्ही मालिका प्रचंड प्रसिद्ध झाल्या होत्या. सर्व अभिनेते सगळ्यांच्या ओळखीचे झाले होते. त्या ओळखीचा त्यांना राजकारणात गेल्यावर फायदा देखील झाला. मालिकांची खूप प्रसिद्धी झाल्यामुळे रामायण आणि महाभारत मालिका राजकारणात जाण्याचा सोपा मार्ग असल्याचं त्याकाळी बोललं जात होतं.
हे खास आपल्यासाठी
धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे का बघितला पाहिजे ?
जॉनी लिवरला वेळ नसायचा तेव्हा त्याचा डुप्लिकेट जॉनी निर्मल पिक्चर पूर्ण करायचा
फक्त बापालाच विश्वास होता त्याच्या मुली जगातल्या सर्वोत्तम टेनिसपटू आहेत