शरद पवारांच्या सगळयात जवळचे कोण आहे ? असा साधा प्रश्न महाराष्ट्रात कोणालाही विचारला तरी उत्तर येईल जयंत पाटील. याचे कारण पण सर्वश्रुत आहे. शरद पवारांनी जयंत पाटील यांना राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष केले आहे. ठाकरे सरकारचा शपथविधी होताना जयंत पाटील यांनीच राष्ट्रवादी पक्षाकडून सर्वात आधी शपथ घेतली. यावरून पण कळते जयंत पाटील यांच्यावर शरद पवारांचा किती विश्वास आहे. पण कोणाला विश्वास बसेल का पवारांचे विश्वासू असलेले जयंत पाटील कधी काळी पवारांच्या विरोधी गटात सामील झाले होते. ही घटना आहे १९९० च्या विधानसभा निवडणुकी नंतरची.
राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्राचे राजकारण बदलले
१९९० च्या विधानसभा निवडणुका काँग्रेसने शरद पवार यांच्या नेतृत्वात लढवल्या होत्या. विधानसभेत काँग्रेसला बहुमत मिळाले. २८८ पैकी १४७ जागा मिळवून काँग्रेसने सत्ता राखली होती. शरद पवार तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. या आधीच्या दोन्ही वेळेस मुख्यमंत्री पदाची पाच वर्ष शरद पवार पूर्ण करू शकले नव्हते मात्र या वेळेस ते पाच वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील असे वाटत होते.
शरद पवारांच्या नशिबात मात्र पाच वर्ष मुख्यमंत्री पद लिहले नव्हते. सगळं काही ठीक चालत असताना देशाचे नेते राजीव गांधी यांच्यावर तामिळनाडू मध्ये तामिळ अतिरेक्यांनी हल्ला केला आणि त्यातच राजीव गांधी यांचा मृत्यू झाला. राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर देशाचे राजकारण बदलून गेले.
राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर १९९१ च्या लोकसभेत काँग्रेस सत्तेत आली. नरसिंह देशाचे पंतप्रधान झाले. काँग्रेस नेतृत्वाने शरद पवार यांना देशाच्या राजकारणात बोलावले. शरद पवार देशाचे संरक्षण मंत्री म्हणून केंद्रात गेले आणि पुन्हा एकदा त्यांना अर्ध्यात मुख्यमंत्री पद सोडावे लागले.
शरद पवार केंद्रात गेल्यावर जयंत पाटील त्यांच्या विरोधात गेले.
गटबाजी काँग्रेसमध्ये अगदी तिच्या स्थापनेपासूनच आहे. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये पण गटबाजी होती. शरद पवारांचा एक गट आणि शरद पवारांना विरोध करणारा दुसरा गट काँग्रेस मध्ये होता, त्यात शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख आणि इतर नेते होते. शरद पवार दिल्लीत गेल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद खाली झाले होते. नवीन मुख्यमंत्र्यांची निवड करायची होती. शरद पवारांना त्यांचा माणूस मुख्यमंत्री पदावर बसवायचा होता तर त्यांच्या विरोधी गटाला शरद पवारांचा माणूस सोडून कोणीही चालणार होता. आपल्याच गटाचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून दोन्ही गट कामाला लागले होते. जयंत पाटील १९९० च्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच निवडून आले होते. विधिमंडळामधला त्यांचा अनुभव नवा होता. त्यांना काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीचा फारसा अनुभव नव्हता. जयंत पाटील यांचे वडील राजाराम बापू हे शरद पवार यांचे स्नेही होते. त्यामुळे जयंत पाटील हे आपल्याच गटात राहतील असा पवारांनी समज करून घेतला. पण जयंत पाटील शरद पवार यांच्या विरोधी गटातील नेत्यांना शब्द देऊन बसले होते.
जयंत पाटील विरोधी गटात गेले असल्याचं समजल्यावर शरद पवार यांनी जयंत पाटील यांना त्यांच्या गटात येण्याचे निमंत्रण दिले मात्र आपण दुसऱ्या नेत्यांना शब्द दिल्यामुळे मी त्यांचा विश्वासघात करू शकणार नाही. असे सांगून जयंत पाटील पवारांच्या विरोधी गटात कायम राहिले.
काँग्रेस मधल्या अंतर्गत गटबाजीच्या राजकारणात शेवटी शरद पवार यांनीच बाजी मारली सुधाकरराव नाईक यांना पवारांनी मुख्यमंत्री केले. आज जेंव्हा आपण शरद पवार आणि जयंत पाटील यांचे राजकारण पाहतो तेंव्हा आपल्याला कल्पना पण नाही होऊ शकत कि राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या विरोधात गेले होते. हे राजकारण आहे इथे काही पण होऊ शकत. शरद पवारांच्या विरोधी गटात काम केलेले जयंत पाटील राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षामध्ये मध्ये आहेत.
हे खास आपल्यासाठी
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
संघाच्या शाखांना पर्याय म्हणून आम आदमी पार्टी १० हजार तिरंगा शाखा काढणार