कोरोनाचा नवा अवतार ओमायक्रोन भारतामध्ये पसरत चालला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे भीतीचे वातावरण वाढले आहे. लॉकडाउन परत लागेल कि काय अशी भीती आहे. आणि या भीतीच्या वातावरणात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि मंत्री वडेट्टीवार भर घालत आहेत कि काय अशी शंका येत आहे.
कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या आहेत. दुसऱ्या लाटेने तर आरोग्य व्यवस्था उध्वस्त करून टाकली होती. हजारो लोकांना त्यांच्या जीवाला मुकावे लागले आहे. त्यामुळे साहजिकच जर कोरोनाचा नवीन अवतार ओमायक्रोन पसरत असेल तर भीती वाढणार, लोक परेशान होणार आणि तसे होताना दिसत आहे. राज्यामध्ये भीतीचे वातावरण वाढत असताना सत्तेतील मंत्र्यांनी लोकांना त्यातून बाहेर काढण्यासाठी मदत केली पाहिजे तशी त्यांच्या कडून अपेक्षा केली जाते. पण महाराष्ट्रात मात्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री त्यांच्या बोलण्यातून भीतीत भर घालत असल्याचा भास होत आहे.
राजेश टोपे कोरोना वाढला कि परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते म्हणतात.
कोरोनाचा सामना करण्यासाठी सुरुवातीला राज्याची आरोग्य तयार व्यवस्था नव्हती. राज्यामध्ये महाविकास आघाडीचं नवीनच सरकार आलं होत. आरोग्य मंत्री राजेश टोपे नवीन होते. तरीही कोरोनाच्या पहिल्या लाटेत सरकारने पूर्ण ताकद लावून सामना केला. एप्रिल २०२१ मध्ये आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देखील सरकार आणि आरोग्य मंत्री म्हणून राजेश टोपेंनी चांगले काम केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने देखील महाराष्ट्र सरकारची तारीफ केली आहे.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत चांगले काम केले आहे म्हणून राजेश टोपेंनी लोकांना सतत भीतीत ठेवण्याचे धंदे बंद केले पाहिजेत. कोरोनाचे थोडे रुग्ण वाढले कि टोपे पत्रकारासमोर येऊन परिस्थिती हाताबाहेर जाऊन शकते, असले भाष्य करतात. आपण दोन तीन वर्षांपासून कोरोनाचा सामना करत आहोत आणि तरी आपली कोरोनाच्या विरोधात लढण्याची तयारी झाली नाही असेच दाखवण्याचा प्रयत्न राजेश टोपे करत असतात. निदान त्यांच्या वागण्यावरून तरी तसे दिसते. एक तर हे महाशय मधल्या काळात कुठे असतात, कोरोनाच्या परिस्थितीत सरकार म्हणून ते काय तयारी करतात याचा काही जनतेला पत्ता नसतो. तशी माहिती जनतेला द्यावी याची काळजी घेताना टोपे दिसत नाहीत पण परिस्थिती हातातून जाऊन शकते असे भाष्य करून भीती वाढवण्यास नेहमी पुढे असतात. ते त्यांनी थांबवायला पाहिजे.
वडेट्टीवार यांना लॉकडाउनची भलतीच आवड दिसते.
महाविकास आघाडी सरकार मध्ये विजय वडेट्टीवार मदत आणि पुनर्वसन मंत्री आहेत. त्यांच्या खात्याच्या हिशोबाने त्यांनी राज्यावर संकट आल्यावर मदत करणे अपेक्षित असते. पण मंत्री वडेट्टीवार याना खूप घाई असते संकट आहे त्यापेक्षा मोठे असल्याचं सांगायची. त्यांना याची सवय झाली आहे का अशी देखील शंका येते. राज्याच्या जनतेला संबोधित करण्याच्या अगोदर ते मुख्यमंत्र्यासोबत देखील चर्चा करत नाहीत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वेळेला त्याचा प्रत्यय महाराष्ट्राला आला आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा करण्याअगोदरच वड्डेटीवार यांनी लॉकडाउन लागणार असल्याचं पत्रकारांना सांगितलं. आणि आता ओमायक्रोनच्या वेळेस देखील वडेट्टीवार त्यांच्या स्वभावाप्रमाणे तारे तोडत आहेत. पत्रकारपरिषद घेत आहेत. ओमायक्रोनमुळे राज्यात लॉकडाउन लावावे लागेल असे भाष्य करत आहेत. मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांना लॉकडाउनने जनतेचे काय हाल होतात याची जाणीव असायला हवी. ती वड्डेटीवार यांच्या भाषेत दिसत नाही. वड्डेटीवार यांना वाटते म्हणून काही लॉकडाउन लागणार नाही पण त्यांच्या बोलण्याने चुकीचा संदेश जनतेमध्ये जात आहे. त्यामुळे वडेट्टीवार यांनी थोड्या पत्रकार परिषद थांबवायला हव्यात. जेणे करून जनतेमध्ये भीती वाढणार नाही.
हे खास आपल्यासाठी
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
संघाच्या शाखांना पर्याय म्हणून आम आदमी पार्टी १० हजार तिरंगा शाखा काढणार