‘एका हाताने टाळी वाजत नाही’ बलात्कार का होतात या चर्चेत एक तरुण हे सांगत होता तर दुसरा म्हणत होता, आजकाल मुली लहान कपडे घालतात. तिसरा म्हणत होता, ‘अरे त्यांचं लफडं असतं पण मॅटर झाला कि मुली म्हणतेत रेप झाला. कोणत्याही घटनेनंतर सर्व साधारण बुद्धीचे माणसं बलात्कार का झाला याचं विश्लेषण असं करतात. कोणत्याही घटनेच्या मुळाशी न जाता आजवर प्रत्येक गंभीर घटनेला आपण लोक नको ते उत्तर शोधतो आणि पुढे हा प्रश्न अजून गंभीर होत जातो. म्हणून आज पण या विषयावर कोणी आणि काय संशोधन केलं हे थोडं डीप जाऊन विषय समजून घेऊ.
तिहार तुरुंगातील एका बलात्काऱ्याने दावा केला आहे की एका ५ वर्षांच्या मुलीवर त्याने बलात्कार केला कारण तिने त्याला उकसवलं होतं. मधुमिता पांडे (पीएच.डी.) यूकेमधील विद्यार्थिनीने तिहारमधील १०० बलात्काऱ्यांच्या मुलाखती घेऊन संशोधन केले होते. २३ वर्षीय हा तरुण कैदी त्यापैकीच एक होता. जेव्हा तिने त्याला पुढे विचारले की ५ वर्षांच्या मुलीने त्याला कसे काय भडकवले तेव्हा त्याने सांगितले की त्या लहान मुलीने त्याला अयोग्यरित्या स्पर्श केला होता, म्हणून त्याने तिला धडा शिकवण्याचे ठरवले. पाच वर्षाची ती लहान मुलगी होती जी मंदिराबाहेर भीक मागायची. भीक मागणाऱ्या तिच्या स्पर्शाने त्याला उकसवलं गेलं हा त्याचा दावा किती खरा किती खोटा ज्यांनी त्यांनी विचार करावा. अधिक विचारणा करताना तो म्हणाला की त्याला फक्त एकच पश्चात्ताप आहे की ती मुलगी आता कुमारी(Virgin) राहिली नाही, त्यामुळे ती ‘शुद्ध’ राहिली नाही म्हणून तुरुंगातून बाहेर येताच तो तिच्याशी लग्न करण्याचा विचार करतोय.
त्याची मानसिकता काय आहे? तो मंगळावर राहणारा नाही, तो त्याच समाजातील आहे ज्यामध्ये आपण राहतो.
बांगलादेश, चीन, कंबोडिया, इंडोनेशिया, पापुआ न्यू गिनी आणि श्रीलंका येथील १०,००० पुरूषांचा समावेश असलेला संयुक्त राष्ट्रसंघाने दोन वर्षांसाठी केलेला बलात्काराचा सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय अभ्यास २०१३ मध्ये प्रकाशित झाला. या अभ्यासात आढळून आले की बलात्कार ही दुर्मिळ घटना नाही. मुलाखत घेतलेल्या चार पुरुषांपैकी एकाने त्यांच्या आयुष्यात कधीतरी एखाद्यावर बलात्कार केला होता, या व्यतिरिक्त दहा पैकी एकाने अशा व्यक्तीवर बलात्कार केला होता जो त्यांचा रोमँटिक जोडीदार नव्हता. बलात्कार करणार्यांमध्ये वारंवार होणारे गुन्हे खूप जास्त आहेत आणि लैंगिकतेबद्दल अस्वस्थ वृत्ती लहान वयातच रुजते. UN संशोधकांनी सांगितले की लैंगिक गुन्हेगारांना हिंसाचार घडवून आणताना “लैंगिक अधिकार” ची भावना वाटते आणि त्यापैकी अर्ध्या लोकांना त्याबद्दल दोषी वाटत नाही.
गुन्हेगारी मानसशास्त्रज्ञ रजत मित्रा ज्यांनी २००८ पासून पाच वर्षांच्या कालावधीत दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद असलेल्या २४२ दोषी बलात्कार्यांवर विस्तृत संशोधन केले आहे. मिश्रा यांच्या प्राथमिक अभ्यासातून काही मुद्दे स्पष्टपणे समोर येतात ज्या गुन्ह्याबद्दलच्या लोकांच्या समजुतीशी आणि गुन्ह्याला चालना देणाऱ्या गोष्टींशी जुळत नाहीत. अभ्यासाने बलात्काराच्या कृतीला तीन श्रेणींमध्ये ठेवले,१) अत्यंत हिंसक बलात्कार २) दुःखद बलात्कार आणि ३) बलात्कार ज्यानंतर खून झाला. गुन्हेगाराच्या मनातील काही गोष्टी क्रमवार त्यांनी मांडल्या आहेत.
बलात्कार हा वर्तणुकीशी संबंधित गुन्हा आहे, तो लैंगिक संबंधांबद्दल नाही. हे अत्यंत भयंकर रीतीने चाललेले हिंसाचार आहे. बलात्कार करणार्या व्यक्तीची संमती घेण्यात असमर्थता दर्शवण्यासाठी हिंसाचार करण्याची गरज आहे अशी गुन्हेगारांची समज आहे. बलात्कार करणारा निर्जन जागा किंवा असह्य पीडितेवर हिंसाचार करण्याची संधी शोधत असतो.
बलात्कार हा उत्कटतेचा गुन्हा नाही किंवा क्षणोक्षणी होणारी कृती नाही. याउलट हे एक विचार करून केलेलं कृत्य आहे, ज्यामध्ये बलात्कारी पीडितेला लक्ष्य करतो, तिचा माग काढतो आणि तिच्यावर हल्ल्याची बारकाईने योजना करतो. संधी शोधून, संधी आल्यावर तो निर्णायकपणे वागतो, कोणताही राग किंवा भीती न बाळगता तो योग्य क्षणासाठी वर्षानुवर्षे वाट पाहू शकतो. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अनेक बलात्कारी आपल्या पीडितेचा पाठलाग करत असल्याचे समोर आले आहे.
बलात्कार हा एक क्रमिक गुन्हा आहे आणि बलात्कार करणारा असा आहे जो वारंवार त्यात गुंततो. काही सामान्य वैशिष्ट्ये अशी आहेत. तब्बल ७२ टक्के बलात्काऱ्यांच्या मुलाखतींमध्ये ते मनोरुग्ण किंवा समाजविरोधी व्यक्तिमत्व विकार त्यांच्यात दिसून आले आहेत. सुमारे ६८ टक्के गुन्हेगारांचे बालपण हिंसा किंवा वाईट पालकत्व आणि दडपशाहीत गेले आहे. बलात्कार करणारा कोणताही अपराधीपणा किंवा पश्चात्ताप दाखवत नाही. याउलट ही कृती हा त्याच्या आयुष्यातील सर्वोच्च बिंदू आहे. त्या घटनेची आठवण त्याला एक थरार अनुभव देते.
बलात्काऱ्यांनी पिडीतेबद्दल खूप संताप व्यक्त करतात, सवयीनुसार त्यांचा तिरस्काराने आणि अपमानास्पद उल्लेख ते सतत करतात. त्यांना इच्छेची मूळ वस्तू म्हणून जवळजवळ अमानवीय बनवतात. त्यांच्या लैंगिक कल्पनांना, मुख्यतः हिंसक, रक्तरंजित आक्रोश, अंमलात आणण्याची अतृप्त इच्छा गुन्हेगारांची असते. हीच गोष्ट त्यांना सामान्य लोकांपासून वेगळं करते. एक सामान्य व्यक्ती चकचकीत लैंगिक चकमकींच्या जंगली कल्पनांमध्ये गुंतू शकतो पण फक्त बलात्कारीच ते वास्तवात करण्यासाठी अथक परिश्रम घेतो.
दिसण्यावरून बलात्कारी ओळखणे अवघड आहे. चित्रपटात दाखवले जाणारे चेहरे बलात्कारी दाखवताना विद्रुप दाखवले जातात पण वास्तवात ते खरं नाही. जास्त प्रकरणांमध्ये बलात्कार करणारा आत्मविश्वास, स्वभाव आणि भरपूर आकर्षण निर्माण करतो. मिश्रा यांनी अजून एक धक्कादायक वास्तव मांडलं आहे कि बलात्कार करणारे नव्वद टक्के लोक पीडितेच्या जवळचे असतात किंवा पीडितेला ते ओळखत तरी असतात. अनेक प्रकरणांमध्ये पीडितेचा अस्पष्ट विश्वास बलात्काराला कारणीभूत ठरतो. अभ्यासात असे दिसून आले आहे की मोठ्या संख्येने बलात्कार करणाऱ्यांमध्ये नातेवाईक, चिकित्सक, एखाद्या पंथाचा नेता किंवा गुरू अगदी शिक्षक यांचा समावेश आहे.
आशा करतो कि हा लेख वाचून बलात्कार हा विषय आपण गंभीरतेने समजून घ्याल ज्यामुळे गुन्हेगारांना कोणतीच सहानुभूती मिळणार नाही.
हे खास आपल्यासाठी
कोका कोलाच्या आधी पुण्यात कोल्ड ड्रिंकची सुरुवात झाली होती
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
युद्धात राणी लक्ष्मीबाईंच्या पाठीवर जे बाळ बांधले होते त्याचे पुढे काय झाले ?