‘कहते हैं मुझको हवा हवाई’ डोळे मिचकावत नव्वदीच्या पिढीला घायाळ करणारी ‘रूप की राणी…’ श्रीदेवी आजही कित्येक जणांची धडकन आहे. हिंदी सिनेमात मधुबाला, हेलन याचा जसा काळ गेला तसाच एक काळ गाजवला तो श्रीदेवीने. इंग्लिश विंग्लिश मधला तिचा निरागस चेहरा अजूनही डोळ्यासमोरून जात नाही. नागिना मधील नागीण खरचं श्रीदेवी आहे असं लहानपणी वाटायचं. मिस्टर इंडिया मध्ये अनिल कपूरशी गोड आवाजात भांडणारी श्रीदेवी इतक्या लवकर मिस्टर इंडियासारखी गायब होईल वाटलं नव्हतं. माणसं दूर जातात पण त्यांच्या भूमिका आपल्याशी सतत बोलत राहतात. ‘लाडला’ मधील खडूस मालकीण असू दे नाहीतर ‘खुदा गवाह’ मधील प्रियकराची वाट बघणारी प्रियसी असू दे. श्रीदेवी तिच्या चाहत्यांच्या मनात कायम घर करून आहे. श्रीदेवीच्या प्रसिद्ध भूमिकांचं लोकांनी कौतुक केलंच पण श्रीदेवीने एक भूमिका अशी केली ज्याबद्दल फारसं बोललं गेलं नाही. श्रीदेवीने फक्त तेरा वर्षाची असताना रजनीकांतच्या सावत्र आईची भूमिका केली होती.
१९७६ ला रजनीकांत, श्रीदेवी आणि कमल हसन या दोघांची मुख्य भूमिका असलेला Moondru Mudichu हा चित्रपट आला. दिग्दर्शक के. भालचंदर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. तेलगू सिनेमावरून हा सिनेमा प्रेरित होता. श्रीदेवीला मुख्य भूमिकेत हा पहिलाच चित्रपट मिळाला होता. रजनीकांतसाठी सुद्धा हा पहिलाच असा चित्रपट होता ज्यात त्याला मुख्य नायकाची भूमिका दिली होती. चित्रपटाची कथा दोन मित्रांची होती जे एकाच वस्तीगृहात राहत होते. त्या दोघांना एकाच मुलीवर प्रेम होते त्याच मुलीची भूमिका श्रीदेवीने केली आहे. रजनीकांत आणि कमल हसन यांच्यातील एका मित्राचा दुर्दैवी मृत्यू होतो. यानंतर रजनीकांत आणि श्रीदेवी यांची जोडी चित्रपटाची कथा पूर्ण करेल अशी प्रेक्षकांना अपेक्षा असताना परिस्थिती अचानक बिघडते आणि श्रीदेवीला चित्रपटातील रजनीकांतच्या वयस्कर वडिलांशी लग्न करावं लागतं. या चित्रपटात श्रीदेवीला रजनीकांतच्या सावत्र आईची भूमिका करायला लागते. चित्रपट तयार होत असताना रजनीकांतचे वास्तव वय २५ होते तर श्रीदेवीचे वय फक्त १३ वर्ष होते. त्यावेळेस कोणालाही वाटले नाही कि श्रीदेवीचे वय केवळ तेरा वर्ष आहे. १३ वय असूनही श्रीदेवीने तिशीतल्या प्रौढ स्त्रीची भूमिका उत्तम साकारली होती. हिंदीतील तिच्या प्रसिद्ध भूमिका जगजाहीर आहेत पण या भूमिकेला पाहिजे तेवढी प्रसिद्धी मिळाली नाही. चित्रपट यशस्वी ठरला पण दक्षिणेचा स्वभाव असा आहे कि त्यामुळे रजनीकांतला चांगली मान्यता मिळाली पण श्रीदेवीकडे म्हणावं तसं लक्ष गेलं नाही.
२४ फेब्रुवारी २०१८ ला श्रीदेवीचा दुर्दैवी अंत झाला. तिच्या मृत्यूनंतर अनेंक शंका उपस्थित केल्या गेल्या. मृत्यू कसाही झाला असेल पण वास्तव हे होतं कि श्रीदेवी आता राहिली नाही. तिच्या अचानक जाण्याने चित्रपटसृष्टी हादरली आहे. प्रेक्षक तिच्या भूमिकांपासून एवढ्या लवकर दूर जायला तयार नव्हता हीच तिच्या उत्तम अभिनयाची पावती आहे.
हे खास आपल्यासाठी
कोका कोलाच्या आधी पुण्यात कोल्ड ड्रिंकची सुरुवात झाली होती
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
युद्धात राणी लक्ष्मीबाईंच्या पाठीवर जे बाळ बांधले होते त्याचे पुढे काय झाले ?