२०१६ मध्ये नितीन सोनवणे जेव्हा विश्व शांती सायकल यात्रा करायचा विचार करत होता. त्यावेळेस मित्र, नातेवाईक यांच्या अशा प्रतिक्रिया चालू झाल्या. पण कोण काय बोलतंय याकडे तो कधीच लक्ष देणारा नव्हता.
नितीन सोनवणे जग फिरायला निघाला खरा, पण इतके पैसे आणायचे कुठून? बाप जाद्याची इस्टेट इतकी नाही कि जग फिरून होईल. पण तरीही विश्वास होता कि यात्रा होणार.
सायकल यात्रा सुरु होण्यापूर्वी दोन अशा गोष्टी नितीन जवळ होत्या कि त्या भरोशावर सगळं काही होईन त्याला वाटत होतं. एक म्हणजे सायकल पुढे लावलेला गांधीजींचा फोटो आणि दुसरा म्हणजे स्वतःवर विश्वास. नोव्हेंबर २०१६ ला वर्धा-बापू कुटी पासून नितीनने सायकल यात्रा सुरु केली.
दरम्यानच्या काळात पासपोर्ट आणि व्हिसा संबंधी कामे करून घेतली. अमेरिका आणि UK चा व्हिसा आधीच काढला कारण या दोन देशांचा व्हिसा on arrival मिळत नाही. वर्धा-पुणे-मुंबई असा सायकल प्रवास करत पहिला देश म्यानमार पासून सायकल यात्रा ठरली. पण म्यानमारचा व्हिसा मिळणं अवघड जात होतं. म्यानमारची तेव्हाची परिस्थिती बिकट होती त्यात विदेशी नागरिकांसाठी त्यांचे जाचक नियम लवकर व्हिसा मिळून देत नव्हते. म्हणून पहिला देश थायलंड ठरला. थायलंड पासून जी यात्रा सुरु झाली ती अजून थांबली नाही. थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, चीन हॉंगकॉंग, साऊथ कोरिया, जपान,अमेरिका, मेक्सिको, लॅटिन अमेरिका, आफ्रिका खंड, युरोप असा प्रवास करत करत तो सर्बिया मध्ये पोहचला आहे. एका ओळीत संपावा इतका हा प्रवास सोपा नाही. दोन देशांमध्ये समुद्र आडवा आला कि विमान तिकीट काढण्यापासून ते प्रत्येक देशात राहण्या खाण्याचा खर्च सगळी जमवा जमवा जमव करायची सोपी गोष्ट नाही. पण तुमचा उद्देश साफ असेल तर मदत करणारे हात पुढे येतातच. नितीनच्या या प्रवासात अनेक लोकांनी नितीनला मदत केली. आर्थिक प्रश्न मिटला तरी प्रत्येक देशात आव्हान वेगळं होतं. . सगळ्याच देशात स्वागत होईल याची काही खात्री नाही. चीन सारख्या देशात नितीनचा संघर्ष अंगावर शहारे आणणारा आहे. चीनमधील लोक बोलायला ही धजत नव्हते. त्यात भाषा समजत नव्हती. शेवटी नितीन पोलीस स्टेशन गेला. भारतातून एखादा गुप्तहेर आल्यासारखी पोलिसांनी दोन तीन तास नितीनची चौकशी केली. फेसबुक व्हाट्सअँप चे सगळे मेसेज चेक केले. सगळी खात्री झाल्यावर त्याला पोलीस स्टेशन मध्ये राहायची सोय केली. जपान, साऊथ कोरिया इथे चांगलं स्वागत केलं लोकांनी. पण लॅटिन अमेरिकेतील आणि आफ्रिकेतील काही देशांमध्ये परिस्थतीत चांगली नाही. आफ्रिकेत नितीनचा मोबाईल चोरीला गेला. यापेक्षाही काही वाईट अनुभव आले. पण नितीन त्यामुळे कधी थांबला नाही. चार वर्षे झाली तरी नितीनचा प्रवास जोमाने चालू आहे. एवढ्या दीर्घ प्रवासात अनेक चांगल्या वाईट प्रसंगाला तोंड देत पुढे जात राहिला.
नितीन सोनवणे हा तुमच्या आमच्यातला अहमदनगर जिल्ह्यातील राशीन गावचा मुलगा आहे. कोणतीही सामाजिक राजकीय पार्श्वभूमी नितीनला नाही. खेड्या गावात वाढलेला हा तरुण स्वप्न घेऊन पुण्यात आला. इंजिनियर झाला. सामाजिक संवेदनशीलता गांधी विचारांकडे घेऊन आली. नितीनच्या आईने मोठ्या कष्टाने नितीनला वाढवलं आहे. नितीन जग फिरायला जातोय म्हणल्यावर कोणत्याही आईला हे पचवणं सोपं नाही. पण आईने नितीनला जाऊ दिलं. कधी कधी नितीनचा फोन लागत नाही तेव्हा सगळ्या कुटुंबाला काळजी वाटते. पण लोक जेव्हा अभिमानाने नितीनचा नाव घेतात. वर्तमानपत्र, टीव्ही,यावर नितीनच्या बातम्या येत राहतात. तेव्हा मित्रांना अभिमान वाटतो आणि नितीनच्या आईला मुलगा सुखरूप असल्याचं समाधान वाटतं.
महाराष्ट्राच्या या सुपुत्राचा मराठी मिररच्या टीमला अभिमान वाटतो. नितीनच्या कामाला आमच्या शुभेच्छा आणि सलाम.
हे खास आपल्यासाठी
सध्या थायलंड मध्ये तापलेल्या आंदोलनाची पाळंमुळं जाणून घेण्याआधी थायलंड समजून घेताना
महाबळेश्वर पहिला असेल पण आसपासची खेडी कधी बघितली का?
आयुष्यभर विसरणार नाही अशी महाबळेश्वरची सफर